मुंबई, दि. १० मे – उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागावी तरच अयोध्येत पाय ठेवण्यास देऊ, असा
इशारा दिला असला तरीही ती त्यांची वैयक्तिक भूमिका असावी. यासंदर्भात उत्तर प्रदेश भाजप, महाराष्ट्र भाजप आणि पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व यांना जर आवश्यकता वाटली तर यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढू शकतील. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये व अयोध्येमधील वातावरण खराब होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण हिंदुत्व ही भाजपची मूळ विचारधारा आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेथील स्थानिक लोकांच्या भावना व्यक्त करण्याचा ब्रिजभूषण सिंह यांचा हा प्रयत्न आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका नसावी. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रातील आमचे नेते देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा पाटील हे एकमेकांशी बोलून समन्वयातून मार्ग काढू शकतील, अशी शक्यताही दरेकर यांनी व्यक्त केली.
अयोध्येच्या दर्शनासाठी कुठलाही नागरिक जाऊ शकतो, रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे कोणीही टोकाची व आतताई भूमिका घेणे योग्य नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेप्रति असलेली त्यांची जनभावना आम्ही समजू शकतो. कारण स्थानिकांचा मुद्दा, स्थानिकांची भावना नक्कीच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक राज्याला स्वतःची अस्मिता असते, असेही दरेकर यांनी सांगितले.
मुंबईत तसेच महाराष्ट्रातसुद्धा उत्तर भारतीयांना न्याय, सन्मान देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे या मूळ विचारधारेमध्येच एकमेकांमध्ये संघर्ष होतोय का, असे मांडे जर विरोधक खात बसले असतील, तर त्यांच्या हातात आपण कोलीत देता कामा नये, असे दरेकर यांनी सांगितले.