मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आणि अधिवेशनात हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालं. “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढं सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस म्हणाले.
सोमवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपाने दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. यावेळी, “या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दोषी असेल त्यावर निश्चित कारवाई होईल”, असं देखील स्पष्ट केलं आहे. यानंतर देखील भाजपाकडून “फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, गुन्हा दाखल करा”, अशी मागणी केली गेली आहे.
दादांचे पोटातले ओठात आले आहे. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भात ओलीस ठेवले काय?
राज्य सरकारने आतापर्यंत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही याचे उत्तर द्यावे. असा जाब भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला विचारला. 72 दिवस झाल्यानंतर सरकार काहीच करत नाही. विदर्भ, मराठवाड्यात लोक राहतात हे सरकारच्या लक्षात आहे का असा घणाघात त्यांनी केला. त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले की 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अजून मोकळा झालेला नाही. त्या आमदारांची ज्या दिवशी होईल त्याच दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळाची घोषणा करू. अजित पवारांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना अजित दादांचे पोटातले ओठात आले आहे. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातील लोक ओलीस ठेवले का त्यांनी? तेथील जनता तुम्हाला माफ करणार नाही असा प्रहार फडणवीस यांनी केला.
शेतकरी, महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डीझेलवर लागणारा कर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्याचा संजय राठोड यांच्याशी कथित संबंध यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. इंधन दरवाढीविरुद्ध नाना पटोलेंचे यांचे आंदोलन म्हणजे नाटक आहे. हे आंदोलन राज्य सरकारविरोधात असेल. असेही फडणवीस म्हणाले आहेत.