मराठयांंचे सैन्य कमी होते. मात्र, निष्ठावंत होते. मुघलांसोबत लाखोंची फौज होती गद्दार मिळालेले होते तरीही त्यांचा पराभव झाला, म्हणाले ठाकरे
मुंबई-दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. आपल्याला जमीन दाखविण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही अस्मान दाखविणार आहोत, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव् ठाकरेंनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले.मुंबईत दौऱ्यात अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात धोका कधीही सहन केला जाऊ शकत नाही. ठाकरेंना भुईसपाट करा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले होते. या वक्तव्याला आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसते, म्हणून मंगलमूर्तीच्या दर्शनाला आल्यावर लोकांनी राजकीय टीका केली. गणपती हा बुद्धीदाता आहे, त्याने सर्वांना बुद्धी द्यावी असे म्हणत अमित शहा यांना टोला लगावला आहे.
ठाकरे म्हणाले, आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना संपविण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. जो या काळात सोबत राहतो तो आपला. शिवसेनेसोबत उरलेल्या आमदारांना लालूच दाखवून ते नेऊ शकले असते. मात्र, हे का नाही जमले असे म्हणत निष्ठा ही कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकत नाही आणि म्हणून हे आमदार शिवसेनेसोबत आहेत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
ठाकरे म्हणाले की, मराठयाचे सैन्य कमी होते. मात्र, निष्ठावंत होते. मुघलांसोबत लाखोंची फौज असूनही, त्यांचा पराभव झाला, असा टोला त्यांनी भाजप आणि शिंदेंना लगावला. मला मुख्यमंत्रिपद हवे असते तर तर आमदारांना मी देखील डांबून ठेऊ शकलो असतो. माझी सुद्धा ममता बॅनर्जीसोबत ओळख होती. तिकडे घेऊन् गेलो असतो. काली मातेच्या मंदिरात नेले असते. मात्र, हा माझा स्वभाव नाही. कारण मला कट्टर शिवसैनिक हवे आहेत आणि ते आज माझ्यासोबत आहेत, असे म्हणताना दसऱ्या मेळाव्यात कुठलेही बंधन नसणार असेही त्यांनी म्हटले आहे.