नांदेड, दि. २२ ऑक्टोबर – फक्त देगलूरसाठी वा नांदेडसाठी ही पोट निवडणूक महत्त्वाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. कारण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. हे अपशकुनी सरकार आहे. कोविड घेऊनच सत्तेवर आले. त्यामुळे देगलूरच्या पोट निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, त्यामुळे देगलूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे यांना प्रचंड मतानी विजयी केले तर येणारी सत्ता ही भाजपची असेल आणि त्याचे शिल्पकार देगलूरची जनता असेल. म्हणून हे पुण्याचे काम करा व महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवा असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज केले.
देगलूर तालुक्यातील झरी गावातील ग्रामस्थांशी प्रविण दरेकर यांनी संवाद साधला, यावेळी दरेकर यांनी सांगितले की, कोविडच्या काळात कुठल्याही प्रकारची यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचली नाही. शेतकऱ्याला मदतीचा हात दिला नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. देवेंद्रजी आणि मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर आलो होतो. पण या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या दमडीची मदत या महाविकास आघाडी सरकारने केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालाय. एका बाजूला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधांतरी ठेवला आहे. महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत, खून खराबा होत आहे आणि या सरकारला या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही अशी टीकेची झोडही दरेकर यांनी उठविली.
देवेंद्रजींच्या काळामध्ये शेतकरी सुखी होता. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतक-यांना मदत होत आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दोन दोन हजार रुपये येतात. पण राज्य सरकारकडून मदतीची एक दमडीही मिळत नाही. राज्य सरकारकडून नुकसान भरपाई कधी मिळणार, मदत कधी येणार या आशेने आम्ही जगत आहोत. पण या सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही अशी कैफियत शेतक-यांनी माझ्याकड मांडल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, आज राज्य सरकार ढिम्मपणे मंत्रालयात खुर्च्या उबवायला बसले आहे. आपल्या सर्वसामान्य माणसाची त्यांना काही पडली नाही. मग याना धडा शिकवणार आहात की नाही. शेवटी लोकशाहीमध्ये तुम्ही मालक आहात. तुम्ही राजे आहात. ते मालक नाहीत आणि तो संदेश झरीवासीनी द्यायचा आहे. सगळ्या लोकांना सांगा कुठल्याही जाती- धर्माचे असा, कुठल्याही पक्षाचे असा, आता आपल्याला राज्याला संदेश द्यायचा आहे की हे सरकार कुचकामी असल्याची टिकाही दरेकर यांनी यावेळी केली.