शिवसेना नगरसेवकांच्या हत्येच्या सुपाऱ्या कोणी दिल्या, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी नक्षलवाद्यांना देण्यात आली होती. मात्र, ही पहिली वेळ नव्हती. ठाण्यातील नगरसेवक आणि अगदी मलाही मारण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी मला समोरच्यांनी सांगितले तुमची सुपारी दिली आहे जपून रहा. आम्ही नाहीतर कुणीतरी हे काम करेल, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
माझ्यासाठी मातोश्री नवे नाही, उद्धव ठाकरे इतरांना मर्द असलेतर हे करा ते करा असे म्हणतात, त्यांनी तरी ते सिद्ध केले का असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. तर रमेश मोरे जयेश जाधव यांची सुपारी कुणी दिली असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सगळी कामे लोकांकडून करून घ्यायची हे उद्धव ठाकरेंचे काम आहे, असा आरोप नारायण राणेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची सामनातून आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागण्यात आले आहे. यातच शिवसेनेवर निशाणा साधण्याची एकही संधी न सोडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरेंची भाषा मर्दानी नाही आणि हे लोकांना मर्द नाही असे म्हणता असा टोलाही राणेंनी लगावला आहे.
आता हिंदुत्व आठवले
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे त्यांना हिंदुत्व, मराठी माणसाची आठवण झाली नाही. मात्र, सत्ता जाताच ठाकरेंना हिंदुत्व, मराठी माणसाची चिंता वाटतेय. उद्धव ठाकरे या व्यक्तीला फार जवळून ओळखतो. त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दुष्टबुद्धी आहे. सत्ता गेल्यामुळे ठाकरे आता तडफडत आहे. संजय राऊतांनी नुकतीच ठाकरेंची घेतलेली मुलाखत ही आपली बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सत्ता गेल्यामुळे व्याकुळ झालेले ठाकरे आता महाराष्ट्रासमोर येत आहे. मात्र, त्यातही खोटारडेपणा आहे.
आजची मुलाखत मीठ चोळणारी
शिवसेना फुटल्याबद्दल खरे तर संजय राऊत यांना समाधान वाटत आहे, असा आरोपही नारायण राणे यांनी केला. राणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाप्रमाणे संजय राऊत यांनी काम केले व शिवसेनेला सुरुंग झाले. आज शिवसेनेची जी काही स्थिती आहे ती केवळ संजय राऊत यांच्यामुळे आहे. हेच संजय राऊत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत आहेत. अशी मुलाखत घ्यायला संजय राऊतांना लाज वाटायला हवी.
एकनाथ शिंदेंना छळले
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंना प्रचंड छळले गेले. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खाते होते. मात्र, या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे पाहत होते. त्यांनी कामांसाठी खोके जमा करण्याचे काम केले. ते खोके झेलायचे काम एकनाथ शिंदेंकडे सोपवले होते. एकनाथ शिंदेंनी हे सर्व सहन केले. मी सहन केले नसते.
आदित्य यांनी तोंड बंद ठेवावे?
नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवरही बोचरी टीका केली. राणे म्हणाले, आज सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दौऱ्यात आदित्य बंडखोर आणि भाजपवर टीका करत आहे. मात्र, आदित्य यांना महाराष्ट्र तरी कळतो का? जवळपास साडे पाच लाख कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महाराष्ट्र राज्याचा मंत्री होण्याची तरी आदित्य यांची ऐपत आहे का. त्यामुळे त्यांनी आदित्य यांनी जास्त बोलू नये. आपले तोंड बंद ठेवावे. दिशा सॅलियनची हत्या आम्ही अजून विसरलेलो नाहीत. दिशाला आम्ही न्याय मिळवून राहू. तिच्या हत्येत सहभागी असलेल्यांना नक्की शिक्षा मिळेल, असे म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.
उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उद्याच म्हणजे 27 जुलैरोजी आहे. त्याच्या खोचक शुभेच्छाही नारायण राणे यांनी दिल्या. राणे म्हणाले, उद्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना आजच शुभेच्छा देत आहे. त्यांना उत्तम व दिर्घायुष्य मिळो, ही सदिच्छा. उद्धव ठाकरेंनी या दिर्घायुष्याचा उपयोग कुणाच घर तोडण्यासाठी, कुणाची सुपारी देऊन त्यांना ठार मारण्यासाठी करावा, यासाठी शुभेच्छा. कारण माझ्यासारखे अनेक कट्टर शिवसैनिक त्यांना पुढेही भेटणार आहेत. ते सर्व शिवसैनिक त्यांना पुरुन उरतील.
आता शिवसेना फक्त मातोश्रीपुरती
राणे म्हणाले, शिवसेना आता फक्त मातोश्रीपुरती मर्यादित आहे. मातोश्रीत राहणाऱ्या व्यक्तींनाच पदे व सत्तेचे लाभ मिळत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह केलेले बंड निश्चितच कौतुकास्पद आहे. शिंदेंनी खरे तर शिवसेना वाचवली. शिंदे यांच्यासोबत खरी शिवसेना आहे. आपले वडील फक्त बाळासाहेब ठाकरे असल्याने आपण त्यांच्या विचारांचेही वारसदार होत नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा उद्धव ठाकरे नव्हे, तर एकनाथ शिंदेंसारखे शिवसैनिक पुढे नेत आहेत.