मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिलं आहे, मात्र हा उन्माद सुरूच राहिला तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा गर्भीत इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.
देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन ड्राइव्ह येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व खुद्द राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.
गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी आझाद मैदानात भाषण केलेे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “काही जण मला म्हणत होते की, 11.55 मिनिटांनी येणार आहे? मी त्यांना बोललो मी काय ट्रेन आहे का वेळेवर यायला? वेळ लागतो,” अशी उत्तर राज ठाकरे यांनी टीकाकारांना दिले.
“सीएए आणि एनआरसीवरून देशभरात मुस्लिमांनी मोर्चे काढले. मला या मोर्चांचा अर्थच लागत नाहीये. देशातील मुस्लिमांना कोण बाहेर काढतय ? कायद्याबद्दल माहिती नसणारेही कसे बोलत आहे? अनेक जण मला म्हणत आहेत, तुम्ही भाजपसोबत जाणार का ? अरे काय सरकारची स्तुती केली, तर भाजपाचा समर्थक होतो का? आपल्या देशात उजवा किंवा डावा इतकंच सुरू आहे. जे चांगलं त्याला चांगलं म्हणालो. जे वाईट होते त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजपा विरोधक ठरवण्यात आले. आता भाजपाचं समर्थक ठरवले जात आहे.” असे राज ठाकरे म्हणाले.
“पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? माणुसकीचा ठेका भारताने घेतलेला नाहीये. या देशातील नागिरांना बाहेर काढले जाणार नाही. इथला आदिवासी इथेच राहणार आहे. मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्याने राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ.” असा इशारा राज यांनी दिला. “देशात सीएए, एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. देशात सध्या जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावे,” असेही राज म्हणाले.
‘सीएए’त गैर काय असा प्रश्न विचारत राज यांनी देशात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांचा समाचार घेतला. तुम्हाला या देशात जे स्वातंत्र्य मिळालं आहे तितकं स्वातंत्र्य जगातील कुठल्याही देशात दिलं जात नाही. त्यामुळे सुखाने राहा. उगाच सगळं बरबाद करायचा विचार करू नका, असा खरमरीत सल्ला राज यांनी संबंधितांना दिला. जे प्रामाणिक मुसलमान आहेत त्यांनीही जगजागृती करायला हवी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.
- राज काय म्हणाले?देशात सध्या कुणीही येतं आणि कुठेही राहतंय. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का तुम्हाला ? देशात इतर अनेक प्रश्न असले तरी बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका भारताने घेतलेला नाही. इतर सगळेच देश त्यांच्या नागरिकांच्या हितांसाठी कठोर पावले उचलतात. एखाद्याकडे पासपोर्ट नसेल तर त्याला दोन पर्याय दिले जातात. एकतर आलास तसा तुझ्या देशात परत जा, नाहीतर जेलमध्ये जा…आपल्याकडेही असंच व्हायला हवं.
इथल्या मातीतला मुसलमान जिथे आहे तिथे कधीही दंगली होत नाहीत. मात्र आज अनेक ठिकाणी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचे मोहल्ले तयार झाले आहेत. तिथे सगळे गैरप्रकार सुरू आहेत. मिरा-भाईंदरसारख्या शहरांत तर आता नायजेरियन घुसखोरांनी उच्छाद मांडला आहे. राज्य सरकारकडून मला अपेक्षा नाही. आता केंद्र सरकारनेच याविरोधात कारवाईचे पाऊल उचलायला हवे.
एनआरसीमध्ये जे देशातले, या मातीतले आहेत त्यांच्याकडे पुरावे मागण्याची गरज नाही. मात्र जे घुसखोर आहेत त्यांची साफसफाई व्हायला हवी आणि त्यासाठीच अशी नोंदणी आवश्यक आहे.