अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे
मुंबई, दि. २२ फेब्रुवारी – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपल्यानंतर लोकसभा अर्थसंकल्प अधिवेशन रद्द करण्याच चित्र समोर उभ करण्यात येत आहे. महत्वांच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील ही सरकारला भीती आहे. म्हणूनच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाचा विषय, वाढीव वीज बिलाचा विषय, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, असे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे राहिले आहेत, त्यासंदर्भात समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे तो आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. सर्वसामान्य लोकांकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिक्षकांच आंदोलन, मराठा समाजाच आंदोलन असेल किंवा अनेक आंदोलन होत आहेत. हे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील, या भीतीने राज्यसरकार अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा सवाल दरेकर यांनी केला. वर्षभर कोरोनाच्या नावाखाली सरकारने काहीच केलं नाही, आता त्याच कारणास्तव अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, सर्व सुरक्षात्मक काळजी घेऊन अधिवेशन झालं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असाच आमचा सरकारकडे आग्रह राहील.