मुंबई-लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर अशोक चव्हान यांनी दोन्ही मते रद्द करावी अशी मागणी केली आहे. मात्र कोणताही विलंब न लावता काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असल्याचे वृत्त आहे, आता कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर परवानगी घेऊनच टिळक आणि जगताप यांनी मतदान प्रकियेत मदत घेतली, असा दावाही त्यांनी केला.विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 5 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे
काँग्रेसचा असंवेदनशिलतेचा कळस – फडणवीस
भाजपचे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली. काँग्रेसने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगतापांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. हा असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.