नाशिक – मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो. अशी भावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो.
काँग्रेस नेतृत्त्वाने एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. असे भुजबळ म्हणाले आहेत.
शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली. शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते. मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी
शरद पवारांसोबत काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. तेव्हा विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. सोनिया गांधींचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्यासह शीला दीक्षित, राजेश पायलट यांनी माझ्याशी संपर्क करून परत येण्याची सूचनाही केली. मात्र मी पवारांसोबतच कायम राहायचे ठरविले.
व्हीपी सिंग यांनी मला दिल्लीत ओबीसींचा राष्ट्रीय नेता व्हायची विनंती केली होती. मात्र आपण ती फेटाळली होती. माझी निष्ठा पवारांशी आहे. त्यांनी मला आजपर्यंत मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून खूप काही दिलं आहे. असे भुजबळ म्हणाले आहेत.