सिंधुदुर्ग-विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगत अमित शाह यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.
तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात
नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. यावेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला. “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.
राणेंवर वारंवर अन्याय झाला त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास वळणावळणाचा आहे. जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा राणेंनी त्याचा प्रतिकार केला. अन्याविरोधात पाय रोवून उभा राहणारा नेता अशी राणेंची ओळख आहे. राणेंवर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो. राणेंसोबत न्यायच होईल याची पूर्ण खबरदारी भाजप घेईल. राणेंसारख्या नेत्यांना कसे सांभाळायचे हे भाजपला चांगल्या प्रकारे माहिती आहे. यशाची नवनवी शिखरे नारायण राणे पादाक्रांत करत आहेत.’ असे म्हणत अमित शाहांनी नारायण राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नारायण राणे महाराष्ट्रातील दबंग नेते
यावेळी फडणवीस यांनी नारायण राणेंचे तोंडभरुन कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, ‘नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे.’
‘नारायण राणेंचा संघर्ष मोठा’
सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील दबंग नेता म्हणून नारायण राणेंना पाहिले जाते. एखादं स्वप्न पाहिल्यावर झोप विसरून नारायण राणे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. 650 हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे.’
‘मी नारायण राणेंचा संघर्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तरतूदी असतात. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्षे वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर पाहतोय’, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नारायण राणे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हाच विचार केला होता की, रुग्णालयाचे उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते करु. असे डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी सुचवले होते.
मेडिकलच्या प्रकल्पात शिवसेनेने विरोध केला. त्यांनी जागा घेण्यास विरोध केला. विकासाला विरोध करणे म्हणजेच शिवसेना आहे. शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा आहे असे म्हणत नारायण राणेंनी निशाणा साधला आहे.
‘नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी
‘नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली.’असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले .
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ‘नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे’, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.