पुणे, ता. २५ जून
सुखी, समृद्ध राष्ट्र निर्मितीसाठी केवळ राज्य बदलायचे नाही तर समाज बदलायचा आहे. समाजाचे सामाजिक, आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे. राजकारण हे त्याचे माध्यम आहे. देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे. कॉंग्रेसने मात्र मतपेढीचे राजकारण आणि आतंकवादाचे दुष्टीकरण केल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल रॅलीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या २० हजारहून अधिक बूथ प्रमुख आणि वीस लाखांहून अधिक नागरिकांना मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. मोदी सरकारच्या दुसर्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश हळदणकर, खासदार गिरीश बापट, पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरली मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.
गडकरी म्हणाले, ‘अस्पृश्यता, जातीयता, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करायची आहे. सुखी संपन्न, समृद्ध राष्ट्रनिर्मितीसाठी सुशासन आणि विकास साधायचा आहे. त्यासाठी र्इ-गव्हर्नन्स महत्वाचे आहे. अंत्योदय ही प्रेरणा आहे. जीवननिष्ठा आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित समाजातील दरिद्र नारायणाला देव माणूस त्याची सेवा करावी, रोटी, कपडा, मकान मिळावे हे आपली जीवन निष्ठा आहे. कार्यकर्त्यांचे चाल, चलन आणि चरित्र महत्वाचे आहे.’
गडकरी म्हणाले, ‘या देशात गुलामगिरीचे प्रतिक असणारे ३७० कलम मोदी सरकारने काढून टाकले. थेट लढून भारताचा मुकाबला करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर जम्मू कश्मिरमध्ये पाकिस्तानने आतंकवादी संघटन आयात करण्याचे धोरण आखले. पण आज सरकार खंबीर आहे. आपल्या कृतीतून मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. गेल्या सहा वर्षांत आतंकवादाचे समूळ नष्ट करून आणि जम्मू कश्मिरचा विकास करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतंकवादाबरोबर नक्षलवादाविरोधात खंबीर लढा सुरू आहे. आदिवासींच्या विकासासाठी सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. देशाच्या एकता आणि अखंडतेबाबत तडजोड करणार नाही अशी सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे देशात बाह्य आणि अंतर्गत सुरक्षितता निर्माण झाली आहे.’
गडकरी पुढे म्हणाले ‘देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढार्इ महत्वाची आहे. त्याविरोधात आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे. नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तसा विश्वास समाजात आणि देशात निर्माण झाला पाहिजे. देशाच्या हितासाठी पंतप्रधानांनी कठोर निर्णय घेतले. त्यात राजकारण केले नाही. संघर्षात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता महत्वाचे आहे. ते आपल्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. ती निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि नेत्यांची आहे. मजबूत राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास या त्रिसुत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ.’
गडकरी पुढे म्हणाले, ‘उद्योजक, लघुउद्योग, हातमाग उद्योग अडचणीत आहेत. सरकार त्यांच्यामागे उभे आहे. सर्वांनी सकारात्मकता ठेवावी. शेतकरी कठीण परिस्थितीत आहे. साखर उद्योग अडचणीत आहे. शेतकर्याचे रक्षण कसे होर्इल हा महत्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने इथेनॉल धोरण आणले. त्याची अर्थव्यवस्था २० हजार कोटी रुपयांची झाली आहे. ती एक कोटीपर्यंत न्यायची आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल करायचे आहे. साखरचे उत्पन्न थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे उसउत्पादक शेतकरी वाचू शकेल.’
पश्चिम सुरत अहमदनगर १२ हजार कोटी रुपयांचा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, मुंबर्इ परिसरात नवीन विकासाचा मार्ग उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
रस्त्याची मोठ्या प्रमाणातील विकासकामे, पालखी मार्ग, उरमोडी, म्हैसाळ, टेंभू अशी अपुरी राहिलेली धरणे पूर्ण केली, कोल्हापूर वैभववाडी रेल्वे, स्मार्ट सिटी, मेट्रो, साखर कारखानदारी वाचविण्यासाठी प्रयत्न असे महत्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
पाटील पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात तत्परतेने रुग्णालयांची निर्मिती, पीपीर्इ किट निर्मिती, वेळेत लॉकडाउन, लॉकडाउन काळात साधनांची उपलब्धता, मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोदींचे उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी या मुळे अन्य देशाच्या तुलनेत कोरोनाचा प्रतिबंध करण्यात यश मिळाले.’