मुंबई, दि. १९ ऑक्टोबर – हिंदुत्व हे काही सोयीच हत्यार नाही, पाहिजे तेव्हा काढायचं पाहिजे तेव्हा म्यान करायचं. हिंदुत्व ही चळवळ आहे. पण हिंदुत्वाची भूमिका मांडताना शिवसेनेची सध्या कसरत होत आहे. कारण एकाबाजुला संमिश्र विचारधारा असणारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या साथीने शिवसेनेला सरकार टिकवायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकवरुन शिवसेनेला आपले अस्तित्व सुद्धा टिकवायचं आहे. पण दुदैर्वाने शिवसेनेचा हिंदुत्वाचा पाया ढासळत चालला असून त्याला पुन्हा एकदा भक्कम करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हिंदुत्वारुन शिवसेनेची भूमिका सध्या द्विधा मनस्थितीत सापडल्याचे चित्र दिसत असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
एनसीबीचे समीर वानखडे हे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, आरोप करायला फार काही अक्कल लागत नाही. लोकशाहीमध्ये आपण कोणावर कोणताही आरोप करू शकतो. परंतु या आरोपातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, पहिल्या दिवसांपासून एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळे आपण ड्रग्ज, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या बाजूने आहात की त्याविरोधात असणाऱ्या कारवाईच्या बाजूने आहात ? असा सवाल दरेकर यांनी केला.
दरेकर म्हणाले, राज्यात एनसीबी या तपासयंत्रणेची विश्वासहार्ता कमी करण्याचं दुर्दैवी काम सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते असणारे तिवारी हे आता तर सुप्रीम कोर्टात जाऊन या सगळ्या विषयावर शिक्कामोर्तब करत आहेत. त्यामुळे आम्ही आर्यनच्या बाजूने आहोत. अंमली पदार्थ आणि ड्रग्ज माफियांच्या पाठीशी आहोत, हे सिध्द होत आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार राज्यातील तपास यंत्रणांच्या विरोधात असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
इतर राज्यातील शेतकऱ्यांविषयी गळा काढायचा…
अमरावती येथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असून यावर बोलताना दरेकर म्हणाले, लखीमपुर येथे शेतकऱ्यांबाबत जी घटना झाली,त्या विषय़ावरून शेतक-यांच्या बाजूने असल्याचा गळा काढायच्या आणि राज्याती शेतकऱ्यांना वा-यावर सोडायचे. शेकक-यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्षित करायचं ही कोणती सरकारची भूमिका? लखीमपुरची घटना दुदैर्वीच होती. आम्हीही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो, परंतु दुसऱ्या राज्यांबद्द कळवळा आणताना महाराष्ट्राच्या शेतक-यांचो काय ? असा सवाल उपस्थित करत दरेकर म्हणाले, छत्तीसगड येथे कॉँग्रेसचे मुख्यमंत्री असताना तेथे शेतकऱ्यांना गाडीने चिरडले होती परंतु त्या वेळेस एक अवाक्षर शब्द त्यावेळेस कोणी काढला नाही. केवळ अमरावतीत नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक भागांत शेतकरी आत्महत्या करत आहे. त्या आत्महत्यांवर बोलायचं नाही? त्यांना मदतीचं आश्वासन द्यायचं नाही. एक रुपयाचं पॅकेजही जाहीर करण्यात आले नाही, केवळ पोकळ घोषणा करायच्या. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काम करताना दिसत नाही. त्यामुळे या आत्महत्या वाढत आहे. यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.