मुंबई. आज शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमिवर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसोबत भगवा ध्वज फडकवला आणि पक्षाचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ‘मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत,’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.आपल्या संवादात ठाकरे म्हणाले की, ‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचे कवच आहे. शिवसैनिकांचे कवच आणि त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे.’
‘राम मंदिराचा निकाल आला आणि आपल्याकडे मुख्यमंत्रिपद आले’
‘विश्वास ठेवणे हा आमचा कमकुवतपणा नाही, ती आमची संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’ ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेना पक्ष प्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आहे आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बिलकुल बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. यानंतर आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले. शिवनेरीच्या मातीचीही कमाल आहे.’
देशात करोना नावाचे विचित्र संकट
देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘करोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. वादळ येऊ द्या, चक्रीवादळ येऊ द्या किंवा कोणतेही संकट येऊ, तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. कस्तुरबा रुग्णालय आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या. आता त्यांची संख्या वाढवून आपण 100 केली, लॅब आणखीन वाढवणार आहोत. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील,’ असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.