सातारा-शिवराय आग्रातून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, औरंगजेबाने जसे शिवरायांना थांबवले तसे शिंदेंनाही कुणीतरी रोखले असे म्हणताना शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले तसे एकनाथ शिंदे हे बाहेर पडले असेही वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात आता पुन्हा खळबळ उडाली आहे
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी असे म्हटल्याचे वृत्त देण्यात आले आहे कि,प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्यात बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
लोढा यांचे हे वक्तव्य दुर्दैवी– अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे, तसे लोढा आणि शिवाजी महाराजाच्रूा इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांचा तितका अभ्यासही असेल असे मला वाटते. त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिवाजी महाराजांनी गद्दारी केली नव्हती, ते स्वराज्य वाचविण्यासाठी महाराजांचे नियोजन कौशल्य होते. राज्यपालांनी ज्या पद्धतीने शिवरायाचा अपमान केला तसेच हे वक्तव्य आहे, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
लोढांच्या वक्तव्याने महाराजांचा अपमान– आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजीत आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.