मुंबई. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता, आणि यापुढेही कधीच नसेल, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. शरद पोंक्षे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता यावर जयंत पाटलांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. या पलिकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष श्री. प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल.’