पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार पवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये असे वक्तव्य केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, परशुराम वाडेकर उपस्थित होते.
आठवले म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत.
मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी संसदेने ठराव पारीत करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ईडी कारवाईशी केंद्र सरकारचा काही संबंध नसल्याचे आठवले म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला ( आहे असे सांगितले, पण या समाजाला लवकर आरक्षण द्यायचे असेल तर त्याचे अधिकार राज्याला देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. तसेच, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची तीन टप्प्यात वर्गवारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याकडे करणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, ”एम्पिरिकल डेटामध्ये अपूर्ण आहे, त्यामुळे तो देण्यात अडचणी आहेत. पण २०२१ ची जनगणना जातीनिहाय करावी, यामुळे जातिवाद वाढणार नाही. समाजात परिवर्तन आता परिवर्तन झाले असून, सर्वजण एकत्र आहेत. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या नेत्या आहेत, केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्या नाराज असल्या तरी त्या भाजप सोडणार नाहीत, भाजपमध्येच राहतील. पंकजा मुंडे या केंद्रीय स्तरावर काम करत आहेत, जी जबाबदारी दिलेली आहे, ती उत्तम पद्धतीने पार पाडावी, असे आठवले यांनी सांगितले.