पुणे-काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आता जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली असल्याचा घणाघात शरद पवारांनी यावेळी केला.
‘मुंबई तक’शी बोलताना शरद पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार?, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का? या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान एक किस्सा सांगत काँग्रेसवर जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जमिनदारांकडे मोठ्या प्रमाणात जमीनी आणि राजवाडे होते. परंतु, कमाल जमीन धारणा कायदा आल्याने त्यांच्याजवळील जमीनी गेल्या आणि राजवाडे किंवा हवेली तशाच राहिल्या.जमिनदारांना आता आपली हवेली दुरस्त करण्याची ताकदसुद्धा राहिली नाहीत. त्यांच्याजवळ आता केवळ 10-15 एकर जमीनी आहेत. परंतु, त्यांना वाटते की, हे समोर शेतीत दिसणारे पीक आपलेच आहेत. अशी अवस्था काँग्रेसच पक्षाची झाली असल्याचे शरद पवार म्हणाले.काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले.