मुंबई – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याअगोदर हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विटरद्वारे निषेध करत संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि कायदा हातात घेतला जातोय.’दरम्यान,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.