रायगड -शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असे ते म्हणाले. या वत्कव्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अनंत गिते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनंत गिते बोलताना म्हणाले की, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. 2 काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल असे ते म्हणाले.
पुढे गिते म्हणाले, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. शरद पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊ शकत नाही. ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे.ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी तटकरेंच्या घरी जाणार आहात का.
आपल्याच घरी, शिवसेनेच्या घरी येणार आहात. असं त्यांनी म्हटलं आहे.