इंदापूर- . “लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला”, अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश जवळ-जवळ निश्चित मानला जातोय. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी सडकून टीका केली
“सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल”, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचे अप्रत्यक्ष संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम केले, पण काय मिळालं, असा सवाल त्यांनी व्यथित होऊन विचारला. मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.
“लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळेचे काम करतील मात्र तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे काम त्यांना करावे लागेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात सुप्रिया सुळे यांना बजावलं होतं, मग त्याचं काय झालं?” असा सवाल पाटील यांनी विचारला. “तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडणार होतात, मग शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात का आली? दौऱ्यात इंदापूर नव्हते मग कसे का आलात? आता यापुढे लबाड माणसांसाठी काम करायचं नाही”, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
“माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तासांचा वेळ दिला, पीएला सांगून कॅबिनेट बैठक रद्द करून प्रकाशनाला आले, एकीकडे शब्द पाळणारे हे लोक तर दुसरीकडे दगा देणारे”, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. यावेळी, हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.