मुंबई-
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. मात्र कोरोनामुळे या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिपूजनाबाबत पंतप्रधान मोदींनी एक सल्ला दिला आहे. कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी ‘राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या मुद्द्याला लढ्याची पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करुन मशीद बांधली होती. त्याठिकाणी आपण पुन्हा मंदिर उभं करतोय. केवळ भारतातील हिंदूंचं नाही तर जागतिक कुतुहलाचा हा विषय आहे. आज आपल्याकडील कोरोनाच्या संकटामुळे सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचे तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार. यामुळे तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे दिला आहे.