पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील धार्मिक स्थळे ही बंद आहेत. धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी विरोधकांसह अनेकांकडून वारंवार केली जात आहेत. याविषयावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? असा सवाल मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र साधले. ते म्हणाले की, ‘पुनःश्च हरी ओम म्हणता आणि ‘हरी’लाच कोंडून ठेवता. बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.’ असे म्हणत बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले आहेत.गेल्या काही दिवसांपासून भाजप तसेच मनसेकडून मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. यासाठी आंदोलने केली जात आहे. भाजपकडूनही या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात आली. मात्र राज्य सरकारकडून अद्याप याविषयावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.