मुंबई-महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारची निंदा केली आहे.
भाजपाच्या कार्यकारणी समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. यात राज्यातील भाजपाचे सर्व नेते, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर शेलक्या शब्दांत टीका केली.
“महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य . फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल.ते पुढे म्हणाले, आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसात काही धाडी पडल्या होत्या आयटी विभागाच्या. त्या धाडीनंतर विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलं होतं, कुठे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कोटीची दलाली, कुठे चारशे कोटीची दलाली. हजारो कोटी रुपयांची लूट चालली आहे, वाटमारी चालली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही.
“राज्यातलं सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणा करता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच. पण येणाऱ्या काळात भाजपाचं स्वत:च्या भरवशाचं स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोरोना संकट, वीजबील थकबाकी, लसीकरण, शेतकरी कर्जमुक्ती योजना, कुपोषण, इंधन दरकपात अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सरकार दररोज तोंडावर पडतंय आणि संपूर्ण जनता हे पाहात आहे. मोदीजींचं अभूतपूर्व काम आपल्या पाठिशी आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर आपण जनतेत जाऊ आणि येणाऱ्या काळात आपल्याला युद्धाला तयार राहावं लागेल. आता काही लोक बोलतील हे युद्ध काय शस्त्रांनी लढायला जाणार आहेत का? पण जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. पहिल्यांदा यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणी पाजू आणि २०२४ आधी राज्यात आपलं सरकार जर आलंच तर ते आपण ‘बोनस’ समजू. त्यापरिस्थितीतही उत्तम पर्याय देण्याचं काम आपण करु. पण येत्या काळात राज्यात स्वत:च्या भरवशाचं आणि आपलं सरकार आणून दाखवू असा मला विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लसीकरणात मोदींनी जगासमोर आदर्श निर्माण केला
कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं केलेल्या विक्रमाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लसीकरणावरही भाष्य केलं. “देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं असं आज राज्य सरकार सांगतंय. ते चांगलंच आहे. आपला महाराष्ट्र लसवंत होतोय याचा अभिमानच आहे. पण राज्याला या लसी दिल्या कुणी? मोदींनी महाराष्ट्र राज्याकडून होणाऱ्या टीका बाजूला ठेवून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचीच भूमिका ठेवली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.