मुंबई, दि. २८- नोव्हेंबर-रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगराध्यक्ष व पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, ३ नगरसेवक आदींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. रायगडमध्ये भाजपा पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी त्या नक्कीच प्रयत्नशील राहतील आणि त्यांच्याबरोबर भाजपात प्रवेश केलेले त्यांचे सहकारीही रागयड जिल्हयातील प्रचंड ताकद आहे, त्यामुळे रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपमय होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व पाली सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह, रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवास्कर, नितीन परब, शाम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशिल शिंदे, मारुती खेरटकर ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, ३ नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस विक्रांत पाटील,दक्षिण रायगड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिध्दीमाध्यामांशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आज भाजपात आलेली ही सर्व मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे चांगलं काम करीत आहेत. गीता पालरेचा या राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या पालीच्या नगराध्यक्षा होत्या. परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा व पदाचा त्याग करुन भाजपामध्ये प्रवेश केला. एखाद्या पदावरती एखादा व्यक्ती विराजमान असताना ती व्यक्ती पदाच्या लालसेपाटी त्याठिकाणी चिकटून राहते. परंतू गिता ताईंनी सर्वच कार्यकर्त्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना राजकीय प्रवासामध्ये जेव्हा भाजपात प्रवेश करायचा होता, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पदाचा त्याग केला आणि नवीन पक्षामध्ये प्रवेश करणे ही क्वचितच घडलेली घटना असावी असेही त्यांनी सांगितले.
सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुक्याचे अध्यक्ष रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवास्कर, नितीन परब, शाम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशिल शिंदे, मारुती खेरटकर आदी अनेक पदाधिका-यांनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे, सुधागड तालुक्यामधील सर्व प्रश्न खऱ्या अर्थांने मार्गी लावण्यासाठी या प्रवाहामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वास दाखवून विकासाच्या दिशेने हा प्रवास सुरु केल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.