मुंबई-राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विधान भवनातील निवडणूक कार्यालयात या दोघांकडून अर्ज सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मविआतील अनेक मंत्री व नेते हजर होते.
संजय राऊत आणि संजय पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: मुख्यमंत्री हजर राहतील, असे काल संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आज शरद पवारांसह मविआतील सर्वच नेते अर्ज दाखल करताना हजर होते. या माध्यमातून महाविकास आघाडीने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा राज्यसभेचा मार्ग जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
दोन्ही जागा जिंकू-संजय राऊत
उमेदवारी अर्ज भरल्यांतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मविआच्या प्रमुख नेत्यांसह शिवसेनेचे सर्व आमदार हजर होते. निवडणुकीत महाविकास आघाडी एक राहतील. शिवसेनेच्या दोन, काँग्रेस व राष्ट्रवादीची एक जागा नक्की निवडून येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
ईडीचा धाक इथे चालणार नाही
भाजपने कितीही सीबीआय, ईडीचा धाक दाखवला तरी राज्यसभेवर मविआचेच उमेदवार निवडून जातील. केवळ ईडीचा धाक दाखवून निवडणुका जिंकू असे भाजपला वाटत असेल तर भाजपने जिंकून दाखवावे. अशा दबावाला आम्ही भीक घालत नाही. ईडीकडून केवळ सुडापोटी राजकारण सुरू आहे. देशाच्या जनतेलाही हे माहित आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.