पुणे- आज दिल्लीत नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यांचे प्रमुखही उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याने मराठी माणसाच्या मनाला निश्चित यातना होतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे.जो महाराष्ट्र देशभरात सर्वाधिक कर रूपाने देशाची आर्थिक घडी प्रथम क्रमांकाने सांभाळतो त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असं स्थान देणे अपेक्षित नव्हते अशी हि प्रतिक्रिया उमटते आहे
“एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी”, असे ट्वीट रोहीत पवार यांनी केले आहे.पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन बडे नेते वगळता जवळपास सर्वच राज्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते