पुणे-: उद्धव ठाकरे गटात आणि इथे काहीच फरक नाही. पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडं इथंही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात येऊन पश्चाताप होत असल्याच्या भावना काही जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांनी खाजगीत बोलून दाखवू लागले आहेत. आम्ही अस्वस्थ असून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यांचाही आता वेळ मिळत नाही , आमच्या भागातील कामे सांगायची कोणाला हा प्रश्न आमच्या समोर असून याच काळात पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज असतानाही त्यांना ताकद दिली जात नाही अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.ज्या कारणासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलो तेच इथे घडत असल्याच्या दु:ख, नाराजी पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.भाजपा आणि फडणवीस यांचे समर्थक यांच्याकडून सवतीचीच वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत .
शिवसेनेच्या नेतृत्वानं अनैसर्गिक युती केली. त्यामुळेच आमदार नाराज होऊन सत्तेतून बाहेर पडल्याचं एकनाथ शिंदेंनी गेल्या ४ महिन्यांत अनेकदा सांगितले आहे. आमदारांना दिली जाणारी अयोग्य वागणूक, मातोश्रीवर सातत्याने होणारा अपमान, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी करावा लागणारा संघर्ष, तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांकडून मिळणारा अपुरा निधी अशी समस्यांची यादी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनेकदा वाचून दाखवली. शिंदे-फडणवीस सरकारला ४ महिने झाले आहेत. आता शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा समोर येऊ लागल्या आहेत.
शिंदे सरकारवर पकड बसवण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात प्रवेशाचा धुमधडाका सुरु झाला आणि बघता बघता हजारो शिवसैनिक एकनाथ शिंदेंचा जयजयकार करत शिंदेंच्या गोटात सामील झाले. हे सगळे होत असताना शिंदे आणि फडणवीस यांच्यात खलबतं होऊन खाते वाटपदेखील झाले. इच्छा असणाऱ्यांना इच्छेप्रमाणे खातं मिळालं, तर काही आमदारांना आश्वासन मिळाले. सरकारचे ४ महिने उलटलेत. मात्र आता इनकमींग करुन शिंदे गटात आलेले शिवसैनिक अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सत्तेत असूनही पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत. भागांना निधी मिळत नाही अशा तक्रारी आता शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत. यामुळे आता एकनाथ शिंदे गटाला मोठं भगदाड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही दिवसात आम्ही सगळे मिळून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या भावना पदाधिकारी यांनी खाजगीत बोलून दाखवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नेतृत्वाने वेळीच पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास एकनाथ शिंदे गट फुटण्याची आणि शिंदे गटात भूकंप होऊ शकतो.