मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं?
मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंप्रांतियाबद्दलची भूमिका बदलल्या शिवाय आम्ही युतीसंदर्भात चर्चाही करू शकत नाही, हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका असं त्यांनी सांगितल्याने मी ते ऐकलं. ते ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर ती, युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसंदर्भातील राजकीय चर्चा झाली.
तसेच, दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. ज्या काळत मुंबईत मी विद्यार्थी दशेत होतो आणि अभाविपचं काम करायचो त्यावेळे ते भारतीय विद्यार्ती सेनेचं काम करायचे, तेव्हापासूनच माझ्या मनात नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं आहे, केवळ दिसण्यापुरतं नाही तर बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्दयांवर आग्रही राहणं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आलंच. परंतु त्यांनी मोठ्या भूमिकेतही यायला पाहिजे हे एक माणूस म्हणून त्यांना म्हणणं वेगळं, पण मी भाजपाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्या भूमिकेतून आज मनसे व भाजपा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर “प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाहीतर नाशिकला प्रवासाला तेही जातात व मी ही जातो, पण नाशिकमध्ये असं अचानक भेटण्याचं काही कारण नव्हतं. आम्ही काही ठरवून भेटलो नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. मी मागील वर्षभरापासून बोलतोय, की त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. पण समोरासमोर आलो आम्ही नाशिकला. त्यानंतर आजची वेळ यायची होती.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.आम्ही निरोप घेताना ‘पुन्हा भेटू’ असं म्हटलो. याला कसलीही राजकीय किनार नव्हती.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी काहीही चर्चा झाली नाही. राज ठाकरेंना त्यांची विचार व्यापक करण्यास सांगितलं. त्यांच्या मनात परप्रातियांबाबत कसलीही कटुता नाही. ती भूमिका व्यवस्थितपणे मांडण्यात सांगितलं असल्याचं चंद्रकात पाटील म्हणाले.
संजय राऊतांना चंद्रकांत दादा यांनी दिले ओपन चॅलेंज
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील एखादा सुरक्षित वॉर्ड बघून निवडून दाखवावं, इतरांच्या क्षमता बघण्यापेक्षा स्वत:ची क्षमता त्यांनी ओळखावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.