मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. त्यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतरच अयोध्येत पाऊल ठेवावं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी उघड धमकीच ब्रिजभूषण यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर त्यांनी ३ जाहीर सभा घेतल्या. पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत त्यांनी रणशिंग फुकलं. पुढे ठाण्यातल्या उत्तर सभेत आणि औरंगाबादेतील सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हिंदुत्ववादाची भूमिकेला आणखी धार लावली. तत्पूर्वी पुण्यातील पत्रकार परिषेद त्यांनी येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. आपल्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या याच दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे, ” “राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका”