नागपूर- एकीकडे देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन रोज एका मुद्यावरून गाजते आहे. विशेष म्हणजे आज तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे महत्त्व वाढले आहे.
राज्यविधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा सुरू झालीय.
फडणवीसांवर हक्कभंग
दिशा सालियानप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, फडणवीस यांनी दिशा सालियानप्रकरणी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर सोमवारी हक्कभं प्रस्ताव आणण्यात येणार आहे.
कोल्हे हत्याकांडाची चौकशी
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल, अशी घोषणा केलीय.