कोलकाता- ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडल्यानंतर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता आज(31 जुलै)त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यादरम्यान त्यांच्यात सध्याची राजकीय स्थिती आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावर चर्चा झाली. तृणमूलच्या सुत्रांनी सांगितले की, राज ठाकरेंनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला. “मी इतर पक्षांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन एकत्रित पद्धतीने मतपत्रिकेवर निवडणुकांची मागणी वाढवावी. टीएमसी या विषयावर आमच्यासोबत आहे. 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात लोकशाही वाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. ममता बॅनर्जी यांनाही मी आमंत्रण दिले आहे.” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. शिवाय ईव्हीएमविरोधात कोर्टात जाणार का, या प्रश्नावर आपल्याला कोर्टावर विश्वास नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात विश्वास नाही, असेही राज म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी ईव्हीएम मशीन्ससोबत छेडछाड झाल्याचा आरोप लावत भाजपच्या विजयावर संशय व्यक्त केलाहोता. त्यासोबतच त्यांनी सध्याच्या निवडणुक प्रक्रियेवर बोट ठेवत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती, त्यावर अनेक पक्षांनी त्यांना समर्थन दिले होते.
अशातच राज ठाकरेंनी आगामी निवडणुक ईव्हीएमवर घेण्याऐवजी बॅलेचल पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठीच राज ठाकरे सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहेत. यासाठीच ममतांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. मनसे आगामी काळात ईव्हीएम विरोधात आपले आंदोलन आणखी मोठे करणार आहेत.
मनसेने येत्या 9 ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या सध्याच्या मतदान आंदोलन करण्याचे ठरवले आहे. मनसेने ईव्हीएमच्या विश्वासहार्यतेवर शंका उपस्थित केली आहे आणि इशारा दिला आहे की, जर आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकेल. दुसरीकडे, महाराष्ट्रात लोकप्रियता आणि जनाधार हरवल्यानंतर आता मनसे प्रमुख इतर भाजप विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. ममता बॅनर्जींना भेटण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची 8 जुलैला दिल्लीत जाऊन भेट घेतली होती.