पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.
सरकारला आणि पोलिसांना अनेक सवाल करत हे आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. याआधी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणने आत्महत्या केली, त्या घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन घटनास्थळाची देखील पाहणी केली. ‘पूजाच्या मृत्यूनंतर सकाळी ७ ते ७.३०च्या दरम्यान इथल्या लोकांनी १०० क्रमांकावर पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन करून घटनेची सगळी माहिती सांगितली होती. ते घटनास्थळावरचे प्रत्यक्षदर्शी होते. पोलिसांनी तो फोनकॉल जाहीर करावा’, असं आव्हान चित्रा वाघ यांनी केलं आहे. एकीकडे ”ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील” अशा तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास असल्याचंही मत मांडलय.
“१७ दिवसांनंतरही FIR का नाही?”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपनं सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यामध्ये बुधवारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १४ प्रश्न राज्य सरकारला विचारल्यानंतर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारणा केली असता तिथल्या पोलिसांनी उडवाउडवीची आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. ‘तिथले वरीष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांनी मला सांगितलं की पूजाच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल न केलेली नाही. आम्हाला वरीष्ठांकडून लेखी आदेश न आल्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली नाही. पोलिसांना FIR दाखल करण्यासाठी कोणाचे आदेश हवे आहेत? घटनेच्या १७ दिवसांनंतर देखील एफआयआर दाखल का केली जात नाही?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सुमोटो का नाही गुन्हा दाखल केला? तसेच पोलिसांना चालवणारा बाप कोण आहे? आणि हत्यारा संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावणार का? असा सवाल देखील वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
“संजय राठोड पोलिसांना दिसतच नाहीत”
संजय राठोड पुणे पोलिसांनाही दिसत नाहीत आणि वाशिम पोलिसांनाही दिसत नाहीत, असा खोचक टोमणा चित्रा वाघ यांनी मारला आहे. “ते दिसतच नाहीत. संजय राठोड मिस्टर इंडिया झालेत की काय कळत नाही. पुणे पोलिसांना तर दिसत नाहीच, वाशिमच्या पोलिसांना देखील दिसत नाहीत. इतका मोठा माणूस आहे. किमान पाच – साडेपाच फुटांचा तरी माणूस असेलच. पण वाशिम आणि पुण्याच्या पोलिसांनी डोळे बंद करून ठेवले आहेत. संजय राठोड म्हणजे डोळे बंद. पण नुसता करोनाचा गुन्हा दाखल करू नका. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अमरावतीमध्ये आंदोलन करताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. पण आता गुन्हा दाखल का केला जात नाही?” असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
“निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी संजय राठोडने लाखांची गर्दी जमा केली. ज्यांनी हे आयोजन केलं, त्या महंतांपेकी पोहरादेवीचे ट्रस्टी कबीर महाराज यांच्या घरी ६ जण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्या गावात २२ करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याची जबाबदारी कोण घेणार?”, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी गुरुवारी सकाळी पूजा चव्हाण राहात असलेल्या इमारतीमध्ये पाहणी केली. यानंतर त्यांनी वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल का झाला नाही? याविषयी विचारणा केल्यानंतर तिथले वरीष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा देखील आरोप त्यांनी केला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा वेगळी आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे सगळ्या महिला वर्गाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडची गच्छंती करावी, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसेच, मी स्वत: शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाहीत. पण, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देणारे कोण आहेत, हेच पुण्याचे पोलीस. जे पोलीस साधा एफआयआरही करत नाहीत. त्यामुळे, जेवढी काही डिटेलींग आहे, ती घेऊन आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार. मला पूर्ण खात्री आहे, हे दोन्ही नेते या घाणेरड्या, गलिच्छ प्रकाराला पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय.