वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ”शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. हे लवकरच समजेल असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. विशेष म्हणजे हा दावा करण्यापूर्वी दोनच दिवसांआधी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाली व ठाकरे गट हा पवारांसोबतच महाविकास आघाडीचे घटक आहेत.
शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभेआधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
भाजपविरुद्ध सर्व विरोध पक्षांना एक करण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही प्रयोग केला. आताच्या असलेल्या प्रयोगात शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचे होते. मी त्यावेळीही म्हणालो आजही म्हणतो की, शिवसेनेने काही तरी करून ती सत्ता आपल्या हातात ठेवून जर ते चालले असते, तर सरकार पडले नसते. सत्तेची गरज ही काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे बदलले हे मी म्हणणार नाही. दोघांत भांडण आहे. दोघेही हिंदुत्ववादी आहेत. मी जे भांडण म्हणतोय त्यात वैदीक हिंदु आणि संत हिंदु परंपरा हा असा आहे.