दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार ?
मुंबई- राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे.
तसेच, मिमिक्री पाहायचीच असेल तर आम्ही ओरिजनल जॉनी लिव्हरची मिमिक्री पाहू. तुमची का पाहू, अशी टीका राऊतांनी केली. काल मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.राज ठाकरेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, केवळ मिमिक्री करून, आमच्यावर टीका करून किती काळ राजकारण करणार आहात. हे आता खूप झाल. तुम्ही आता बऱ्याच वेळापासून राजकारणात आहात. केवळ टीका करण्यापेक्षा राजकारणात काही तरी विधायक काम करून दाखवा. दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहत आहे.
4 दिवस राहुल गांधींसारखे चालून दाखवा
राज ठाकरे यांनी काल भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मिमिक्री करून त्यांच्यावर टीका केली होती. यांचा उल्लेख करून राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी प्रचंड कष्ट घेत आहेत. ते जेवढे कष्ट घेत आहेत, तेवढे कष्ट तुम्ही चार दिवस तरी घेऊन दाखवा. तसेच, उद्धव ठाकरे आता बाहेर पडले, असे म्हणणाऱ्यांनी त्यांची नुकतीच झालेली बुलढाण्यातील सभा पाहायला हवी होती. ठाकरेंचे स्वागत करायला संपूर्ण बुलढाणा रस्त्यावर उतरला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यांचा अल्टीमेटम आता संपला आहे. याबाबत राऊत म्हणाले, राज्यपालांविरोधात अॅक्शन प्लॅन बनवण्याचे काम सुरू आहे. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीत एकजूट आहे. उद्धव ठाकरे मविआताल इतर नेत्यांशी बोलून लवकरच याबाबत माहिती देतील.
संजय राऊत म्हणाले, भाजपच्या आराध्य दैवतांकडून महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचा अपमान होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे भाजपचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे शिवरायांच्या अपमानाचा विषय आपण नेहमीच्या राजकारणाने बाजूला करू, असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. कोणत्याही क्षणी आम्ही राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा राऊतांनी दिला