“आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केलं. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असं बोलण्याचं त्यांनी औदार्य दाखवलं नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले”, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला. “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का असा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राबाबत, मराठी माणसाबाबत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं. त्यावर त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही”, असं अमोल मिटकरी म्हणाले.