गेल्या 40 वर्षांतील हे सर्वात मोठे यश – खासदार काकडे
पुणे, दि. 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर, राज्यातील जनतेने आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य दिले. हा अपेक्षेप्रमाणेच महाजनादेश मिळाला असून 164 जागा लढवून 106 जागा जिंकलेल्या भाजपाचे हे यश 70 टक्के आहे. गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला भाजपासारखे याप्रमाणात इतके मोठे यश मिळालेले नाही, असे रोखठोक मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.
भाजप व शिवसेनेला मिळालेला कौल आणि सरकार स्थापनेसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीला सत्तेत बसण्यासाठी कौल दिला आहे. शरद पवार व काँग्रेसच्या नेत्यांनी ते विरोधात बसणार म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे हे चाणाक्ष असून सध्या ते जादा मंत्रिपदं मिळावीत म्हणून बार्गेनिंगसाठी बोलत असावेत. राष्ट्रवादी व काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना पिंजऱ्यातून नेले. हे शिवसैनिक अजून विसरला नाही आणि बाळासाहेबांना पिंजऱ्यातून नेणाऱ्यांसोबत जाणे हे कडवट शिवसैनिकांना कदापि आवडणार नाही. याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये निश्चितपणे सहभागी होईल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
1995 ला शिवसेनेला 73 व भाजपला 65 जागा मिळालेल्या असताना शिवसेनेने भाजपाला मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. त्या तुलनेत आताच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्यात व 19 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे फार न ताणता शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी होईल. आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.
निवडणूक लढवित असताना प्रत्येक पक्ष मोठं लक्ष्य ठेवत असतो. आणि निवडणुकीचा निकाल पाहिला तर, गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही इतकं चांगलं यश भाजपाला मिळाले आहे. 1999 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीलाही 82 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. त्याउलट या निवडणुकीत 164 जागा लढवून भाजपा व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्या. 19 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने 2014 च्या संख्येइतकं संख्याबळ भाजपाचे आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.