पारनेर- येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झा होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र हा प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. यानंतर राजकीय वातावरण तापले. महाविकास आघाडीत काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा झाल्या. यानंतर आता शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी चर्चा करत हा तिढा सोडवला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आता शिवसेनेत परतले आहेत. या पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी पाचही नगरसेवकांना मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीत (जि. नगर) शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार नीलेश लंके यांच्या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असल्याचे बोलले जात होते.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार लंके यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच हा पक्षप्रवेश करण्याचा लंके यांचा प्रयत्न होता, परंतु काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्यामुळे शनिवारी बारामतीमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला होता. दुपारी उमा बोरुडे यांच्यासह डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी व किसन गंधाडे यांच्या गळ्यात पक्षाचा पंचा टाकून पवारांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता हे नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत.