मुंबई, दि. २ ऑगस्ट- महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. पाच वर्षाच्या काळात फडणवीस सरकारने जी काम व प्रकल्प पूर्ण केली होती, त्या काळातील प्रकल्पांचे उदघाटन करण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
दक्षिण मुंबईच्या, शिवडी विधानसभा समर्थ बूथ अभियानाचा शुभारंभ रविवारी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, राजकीय व सामाजिक स्तरावर यंत्रणा सक्षम करत कार्यकर्त्यांची संघटना गठीत करत समर्थ बूथ सक्षम करूया. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक असो किंवा शिवडी विभागातील जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायला सोपे पडेल.
येणाऱ्या काळात भाजपलाच जनाधार
भाजपकडून विकासाच्या कामाला देशपातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. कोरोना असो किंवा महापूर, प्रत्येक वेळेला केंद्राने भरीव पॅकेज राज्याला दिले आहे. गरीब कल्याण पॅकेज, आत्मनिर्भर भारत आशाप्रकरे वेगवेगळ्या पॅकेजच्या माध्यमातून राज्याला केंद्राने मदत केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. मी अगोदर शिवसेनेमध्ये काम केले आहे, त्यामुळे अगोदर कधी आपत्ती आली तर सर्वप्रथम शिवसैनिक धावून जायचा, ट्रकमध्ये जीवनावश्यक सामान घेऊन गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवायचा परंतु दुर्दैवाने आज ती जागा भाजपने घेतली आहे. आज शिवसेनेकडे सत्तेचा मुकुट असल्यामुळे शिवसेनेची सामाजिक बांधिलकी संपलेली दिसून येत आहे.
त्यामुळे उदघाटन करण्याचा योग
देवेंद्र फडणवीस यांच्या ५ वर्षाच्या कालावधीत मोनो रेल, मेट्रो रेल, उड्डाणपूल आशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, प्रकल्प राज्यात आणले गेले. राज्याने ५ वर्षांच्या कालावधीत विकासाचे चित्र डोळ्यांसामोर पाहिले. प्रथमच फडणवीस सरकारच्या काळात विकासासाठी ३ लाख कोटी रुपये प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. आजही बिडीडी येथे प्रकल्पाचे उदघाटन झाले ते केवळ देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच. जे उड्डाणपूल भांडुप येथे झाले ते काही १ वर्षात झाले नाही. त्या उड्डाणपूल संबंधित परवानग्या, निविदा कोणी काढल्या हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे केवळ ठाकरे सरकारच्या नशिबात आज सत्ता असल्यामुळे उदघाटन करण्याचा योग त्यांना लाभला असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली.