पुणे -जोपर्यंत शेतकरी, कृषी आणि कामगार विधेयक केंद्र सरकार मागे घेत नाही तोवर कांग्रेस आंदोलन सुरु ठेवेल , आज राज्यपाल यांना भेटून निवेदन दिले, आता येत्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिन किसान मजदूर बचाओ दिन म्हणून राज्यभर या आन्दोलनाची तीव्रता वाढवली जाईल असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘माय मराठी’ला सांगितले.
ते म्हणाले,’ मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे असा आमचा आग्रह होता. किमान भाजपाने आपला मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती पण त्यांनी ते ही केले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. या कृषी विधेयका विरोधात काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन करणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपात काँग्रेसचे खासदार, आमदार, पदाधिकारी असे आम्ही सर्वजण राज्यपालांना भेटलो.
या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात २ ऑक्टोबर हा दिवस किसान मजदूर बचाओ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा व विधानसभा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील.