रत्नागिरी-गुजरातचेच पंतप्रधान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि ते आमच्या हक्काचे पैसे आहेत भीक नाही अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.ते आज तौकते चक्रीवादळाने झालेल्या नुक़सानीची पहाणी करण्यासाठी रत्नागिरीत आले होते.
यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपाल पदाची एक वेगळी गणिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जी नावं पाठविण्यात आली आहेत, ती नियमाला धरून पाठवण्यात आली आहेत. जर त्याच्यात काही चुकलं असेल तर राज्यपालांनी कळवलं पाहिजे. त्याच्यात काही क्वेरी असेल तर राज्य सरकार करून देइल, मात्र त्यांची नियुक्ती थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. भाजपने या प्रकारचं कृत्य करू नये, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.