मुंबई- हिंदुत्वाची शिडी करून वर गेलेले इंग्रजांची फोडा -झोडा नीती वापरतील ,मराठ्यात जाती पातीने भेद करतील ,मराठी -अमराठी वाद निर्माण करतील असा आरोप करत अशांमुळे हिंदुत्व खरं धोक्यात आहे असे मत स्पष्ट करून महाराष्ट्रातील तमाम मराठा तितुका मेळावा ..सांगत एकत्र येण्याचे आवाहन तर केलेच त्याबरोबर मराठी अमराठी असा वाद हि न घालता तमाम हिंदूंनी सुद्धा भक्कम एकजूट बांधावी असे आवाहन आज शिवसेना प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना केले .
मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा व विरोधकांवर विविध मुद्द्य्यांवरून जोरादार टीका केली.या देशामध्ये हिंदुत्व धोक्यात आहे का?, गृह मंत्रालयाने हिंदुत्वाला धोका नाही असे सांगितलेय. याच दिवसाची या क्षणाची वाट पाहत होतो. हिंदुत्व आता धोक्यात आले आहे. नवहिंदू उपटसुंभ यांच्यापासून हिंदुत्वाला धोका आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तापिपासूपणा भाजपाचा घात करत आहे. सत्ताची नशा इतरांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते याचं भान राखलं गेलं पाहिजे, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. “मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळलं म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी वडिलांना दिलेलं वचन पाळण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आलेली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मी मोठ्या हिमतीनं स्वीकारली आणि हे आव्हान मी पेललं. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाहीत. त्यामुळे तुमची आज केविलवाणी अवस्था झालीय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपा म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी
“भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे”, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार पाडायची वक्तव्य केली जातात. हिंमत असेल तर पाडून दाखवाच. सरळमार्गानं काही होत नाही. म्हणून छापा टाकायचा आणि काटा काढायचा ही असली थेरं महाराष्ट्रात चालू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) केला आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यांना भाजपनं ब्रँड ऍम्बेसेडर करायला हवं. काही जाहिराती असतात ना, तशी त्यांची आजची स्थिती आहे. आधी मला झोप यायची नाही. मग कोणीतरी सांगितलं भाजपमध्ये जा. आता मी कुंभकर्णासारखा झोपतो. दरवाजे कितीही वेळा ठोकला तरी उठत नाही, अशी काहींची आजची अवस्था आहे. ही काय लायकीची माणसं घेतली आहेत भाजपनं?, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
स्वत:च्या हिमतीवर आव्हानं द्या; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात, असं ठाकरे म्हणाले.