मुंबई- महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच रातोरात कंपन्या उघडून कंत्राटे घेतली. या आरोपांची अनेक महिने चौकशी सुरू आहे. यापुढे नगरविकास खात्याकडून कालबद्ध वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल. महापालिकेने सर्वसामान्य जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळवला आहे. अशा आरोपांचे महालेखापरीक्षकांकडून विशेष ऑडिट करण्यात येईल,महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे महालेखा परीक्षक अर्थात कॅगकडून विशेष ऑडिट करण्यात येईल. याशिवाय काही आरोपांची नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल. ही चौकशी कालबद्ध वेळेत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली.
सत्ताधारी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुंबईच्या 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा डाव टाकला. फडणवीस यांनी आपल्या उत्तरात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कोणत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे, याची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले की, मुंबईतील कोरोना केंद्रात गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.या काळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच रातोरात कंपन्या उघडून कंत्राटे घेतली. या आरोपांची अनेक महिने चौकशी सुरू आहे. यापुढे नगरविकास खात्याकडून कालबद्ध वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल. महापालिकेने सर्वसामान्य जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळवला आहे. अशा आरोपांचे महालेखापरीक्षकांकडून विशेष ऑडिट करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
भेंडी बाजार प्रकल्पाचे सर्व आराखडे बदलण्यात आले आहेत. पारंपरिक रस्ते बंद करून रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली. यातून अतिरिक्त जागा चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) रूपात विकासकांना देण्यात आली. एक भेंडी बाजार उचलून दुसरा भेंडी बाजार तयार केला जात असेल तर ते योग्य नाही. प्रकल्प आराखडा का बदलला आणि या भ्रष्टाचारामागे कोण आहे, याची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आश्रय योजनेतील भ्रष्टाचार, तसेच रस्त्यांची कामे, शाळांचे व्हर्च्युअल स्टुडिओ यासंदर्भातला व्यवहारसुद्धा तपासून पाहण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. गेल्या 25 वर्षांत मुंबई महापालिकेत तीन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी चर्चेदरम्यान केला.