मुंबई – शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने अजित पवार यांच्याशी युती करत सरकार स्थापन केले. सकाळी आठ वाजता राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच भाजपने राजकीय डावपेच टाकत महाविकास आघाडीवर मात केली. दरम्यान रविवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवू दिले. भाजपने महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला. घोडेबाजार करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला, भाजपनं सचोटीन व्यापार करायला हवा होता. असा घणाघात राऊत यांनी यावेळी केला. भाजपकडे बहुमत होते तर चोरून शपथविधी का केला? भाजपने राष्ट्रपतीभवन आणि राजभवनात काळाबाजार केला आहे. अशी टीका केली आहे.
दरम्यान तीन पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचे बहुमत आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर अजित पवार यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.