खासदार संजय काकडे यांचे पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर
पुणे, दि. 19 ऑगस्ट :भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मधून येणाऱ्या नेत्यांचा ओघ काही केल्या थांबत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी विविध प्रकारे प्रयत्न करताना पक्ष सोडून गेलेल्यांना कावळ्याची उपमा दिली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशाप्रकारे बोलण्यावर आक्षेप घेत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. स्वतः शरद पवार यांनी दोनवेळा काँग्रेस सोडली. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना शरद पवार जर कावळे म्हणत असतील तर, जेव्हा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? असा रोखठोक प्रश्न खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्यासारखा जेष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे खरं तर अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असलेले विजयसिंह मोहिते पाटील, पिचड, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादी ला रामराम करून भारतीय जनता पक्षात का आले याविषयी शरद पवार यांनी मनापासून एकदा तरी आत्मपरीक्षण करावे. वीस वीस वर्षे बरोबर राहिलेली माणसं आता दूर का जातायत हे त्यांनी तपासून पहावे. खरं तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम होत असल्यानेच ही सारे नेते भाजपात येत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजीला ते आता कंटाळले असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कणखर नेतृत्वाकडे ते आकर्षित झाले आहेत, असे खासदार संजय काकडे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 35 वर्षांपासुन रखडलेले मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत आणून त्याची अंमलबजावणी सुरू केली. शरद पवार व काँग्रेस कोणत्याही मुख्यमंत्र्याला त्यांच्या सत्ताकाळात हे जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवले. फडणवीस सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पाठविले. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. जलशिवार योजनेतून महाराष्ट्राचा दुष्काळ कायमचा हटविण्याच्या निर्धाराने काम सुरु आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व देत असल्याने व विकासाची खात्री पटल्यानेच भाजपमध्ये इतर पक्षातील नेते येत आहेत व पुढेही अनेक नेते येण्याच्या मार्गावर आहेत, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
याबरोबरच स्वातंत्र्यापासून कलम 370 रद्द होण्याची आपण वाट पाहत होतो. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवले. एक देश एक कर प्रणाली, रस्ते विकास, संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी अनेक आघाड्यांवर मोदी सरकार उत्तम कार्य करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तर, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय हा विश्वास आता सगळीकडे दिसतोय. म्हणूनच भाजपमध्ये येण्याचा कल वाढत आहे.
भाजपमध्ये अनेक नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरु असलेल्या तरी आम्ही अजित पवार व सुनील तटकरे यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपमध्ये घेतलेले नाही व भाजप अशांना घेणारही नाही. तसे पक्षाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच जाहीर केल्याचेही खासदार संजय काकडे यावेळी म्हणाले.