पुणे-नरेंद्र मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान बघितलेला नाही. अण्णा हजारेंमुळे हे सगळे सत्तेत आहेत. केजरीवाल काळा की गोरा हे माहितही नव्हतं. अण्णांमुळे देशाला समजलं. आज तुम्ही अण्णांना भेटायला येत नाही. साधी तब्येतीची विचारपूस करत नाही. अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी दोघांनी अण्णांना वापरुन घेतलं अशा शब्दात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.
मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा लोकपालाची नियुक्ती झाली पाहिजे अशी तुम्ही भूमिका होती मग आता का नाही? असा सवाल राज यांनी विचारला. निवडणुकीत मोदी-शाह विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई होईल. कदाचित त्यामध्ये भाजपही असेल. भाजपाच्या काही नेत्यांच्या मनात मोदींबद्दल नाराजीची भावना आहे या प्रश्नावर गडावरचा गडकरी खूप महत्व असतो असे सूचक विधान राज यांनी केले.
हे निर्लज्ज सरकार आहे. माणस वापरुन फेकून देण्याच काम हे करतात असे राज म्हणाले. अण्णा जगले काय किंवा गेले काय ? याचं सरकारला काहीही पडलेलं नाही अशी टीका राज यांनी केली. हा अर्थसंकल्प निवडणूका डोळयासमोर ठेऊन तयार केला असून वेगळया मार्गाने पैसे वाटण्याचा हा प्रकार आहे अशी टीका राज यांनी केली.
सीबीआय, आरबीआय या स्वायत्त संस्थांवर मोदी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वायत्त संस्था स्वत:च्या राजकारणासाठी वापरणं हे दुर्देवी आहे असे राज म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. आरबीआयच्या दोन गव्हर्नरनी राजीनामे दिले ही चांगली गोष्ट नाही. आलोक वर्मा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेरनियुक्तीचे आदेश दिले. ती मोदी सरकारची पहिली हार होती असे राज म्हणाले.
कोलकात्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात ते म्हणाले की, सीबीआयचे ४० जण पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकतात. हे पंतप्रधानांना माहित नाही असं होऊच शकत नाही. पोलीस आयुक्त ही साधी व्यक्ती नाही असे राज म्हणाले. सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस असा संघर्ष होणे देशासाठी घातक आहे असे राज म्हणाले.