मुंबई-गेल्या काही दिवसांपासून काहीसे शांत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेणार आहे.या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत . मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असलेल्या एमआयजी क्लब या ठिकाणी हा मेळावा घेतला जाणार आहे.आणि याच मेळाव्यातून राज ठाकरे हे १०० ते १२५ जागा लढविण्याची घोषणा करतील आणि पुण्यासह अन्य उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करतील असे मनसेच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले
राज ठाकरे या मेळाव्यात सगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सांधणार आहेत अशी माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रुपरेषा ठरवणार असल्याचीही शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कडाडणार असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खास करुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे बहुदा सोमवारी स्पष्ट होऊ शकतं. कारण मनसे 100 जागा लढवणार अशीही माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. कदाचित हीच घोषणा राज ठाकरे सोमवारी करण्याची शक्यता आहे.निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमवरच होणार हे स्पष्ट केले त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही अशी चर्चा होती.मात्र मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून राज ठाकरे यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे असेही समजते आहे.