मुंबई. या कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास, आमची परवानगी घ्यावी लागेल,’ असे योगी म्हणाले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात येता येणार नाही’, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी मजुरांचे पलायन सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातील मजूर आपापल्या राज्यात जात आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी, उत्तर प्रदेशातील कामगारांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर मनसेकडूनही समाचार घेण्यात आला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन राज ठाकरे म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.’