मुंबई: ‘करोनामुळे आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर माझ्याकडे, तुमच्याकडे, राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे… अगदी कुणाकडेच उत्तर नाही. संपूर्ण जग या संकटात चाचपडतंय. त्यामुळेच उगाच टीका करून कुणाचे ‘मॉरल डाऊन’ करू नका’, अशी सुस्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत मांडली. यावेळी महाराष्ट्रातून आपापल्या राज्यात परतत असलेल्या मजुरांवर राज यांनी कठोर शब्दांत निशाणा साधला.मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी आपली मते परखडपणे मांडली.
लस मिळेपर्यंत लॉकबंदी …? हा उपाय नाही ….
● गेला दीड महिना पोलीस अहोरात्रं काम करत असल्यामुळे त्यांना थकवा जाणवतो आहे त्यामुळे ‘राज्य राखीव पोलीस दल’ बोलवण्यात यावं त्यामुळे पोलीस यंत्रणेला थोडीशी का होईना उसंत मिळेल आणि समाजकंटकांवर दरारा राहील.
● स्पर्धा परिक्षांसाठी पुण्यात आलेल्या राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांची त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी.
● जे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले आहेत ते जेव्हा पुन्हा येतील किंवा आणले जातील तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. जेणेकरून आतापर्यंत जी अनागोंदी माजली होती ते पुन्हा होणार नाही.
● परप्रांतीय परतल्यामुळे काही उद्योग-धंदे ठप्प होणार असतील तर अशा ठिकाणी महाराष्ट्रातील तरुणांना-तरुणींना प्राधान्य द्यावे, सरकारने त्या रोजगारांची माहिती राज्यात सर्वदूर पोहचवावी.
● शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल.
● शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार ह्यांना सुरक्षा साधनं अपुरी पडत आहेत, त्यांना मुबलक सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावं.
● कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.
राज्यात करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईची अशी परिस्थिती मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे नमूद करत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या.परराज्यातील मजुरांवर राज यांनी जुन्या भाषणांचा संदर्भ देत निशाणा साधला. मी जुन्या भाषणांत सांगितलं होतं, अडचण आली की हे परप्रांतीय सर्वात आधी निघून जातील आणि आता तेच घडतंय. यातून बोध घेऊन परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. जे परप्रांतीय मजूर आज बाहेर गेले आहेत, ते परत आल्यावर त्यांची तपासणी करून व नोंदणी करूनच त्यांना महाराष्ट्रात घ्यावे, अशी सूचना राज यांनी केली.परंप्रांतीय कामगार येथून जात आहेत. त्यामुळे विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील जे तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवायला हवा. रोजगाराची ही संधी त्यांनी दवडायला नको, असा सल्ला राज यांनी दिलाय.लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लान काय आहे? लॉकडाऊन उठवण्याआधी एक्झिट प्लान तयार असायला हवा. जोपर्यंत करोनावर लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. हे लक्षात घेऊन पावले टाकायला हवीत. लॉकडाऊन उठवतोय हे आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. लॉकडाऊन कसा काढणार, काय सुरू होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं लागेल, असे राज यांनी सरकारला सांगितले.