मुंबई- नरेंद्र मोदी राहुल गांधीच्या लोकप्रियतेला घाबरले आहेत. त्याचमुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचे म्हटले आहे
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे सुडाचे राजकारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरत आहेत. त्याचमुळे ही कारवाई सूडभावनेने करण्यात आली. ही अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांना समाजात प्रतिसाद वाढत आहे. त्यातुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रियता महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यांमुळे वाढत आहे. हे प्रश्न सोडवण्यात मोदी अपयशी ठरत आहे. काँग्रेसला, राहुल गांधींना मिळालेली लोकप्रियता भारत जोडोच्या माध्यमातून दिसली याचाच धसका मोदींनी घेतला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, इंदिराजी घाबरल्या नाही. राहुल गांधी घाबरणार नाहीत. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. तसेच राहुल गांधी पंतप्रधान झालेले दिसतील. लोकसभेत एखादा आरोप ठेवल्यावर त्या व्यक्तीला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. त्यांनीच सभागृहात गोंधळ घातला, त्यामुळे आता काँग्रेसला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. लोकशाहीसाठी, देशासाठी, राज्यासाठी आम्हाला काम करावे लागेल.