मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करविण्यासाठी अत्यंत हीन दर्जाचे राजकारण:
मुंबई-काँग्रेस नेते यांनी परदेशात भारताविषयी केलेले कथित अवमानकारक विधान व त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकराविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे गुरुवारी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी राहुल यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांच्या या कृतीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘आमच्याकडेही सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांचे फोटो व जोडे आहेत,’ असे ते सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावत म्हणालेत.सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन केले. सत्ताधारी पक्षाला अशा प्रकारच्या हीन पातळीवर उतरून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही. तसेच महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचेही पाप झाकता येणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अडीच वर्षांपूर्वी आजचे सत्ताधारी पायऱ्यांवर होते. आज आम्ही पायऱ्यांवर होतो. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन होत असतात. जनतेचे प्रश्न मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. पण आम्ही असा प्रकार केव्हाच केला नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत आक्षेपार्ह असे हे वर्तन आहे. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत हे लक्षात ठेवा. आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले. ज्या गावच्या बोरी असात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताक्षाने लक्षात ठेवावे, असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
2014 पासून देशाचे राजकारण बदलेले आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहेत. विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा अधिकार कुणी दिला? लोकशाहीमध्ये वाद-प्रतिवाद हा विषय असतो. आपण प्रतिवाद केले पाहिजेत. पण आता थेट गद्दार ठरवले जात आहेत. याचा राहुल गांधी व आम्ही कडाडून विरोध करत आहोत. देशाची लोकशाही टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधकांना तपास यंत्रणांची भीती दाखवून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? अशी टीकाही त्यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधताना केली. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सत्ताधाऱ्यांच्या राहुल गांधींच्या जोडे मारण्याच्या कृतीचा निषेध केला होता. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. पण विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये, असे ते म्हणाले.